अरुणा ढेरे अध्यक्षीय भाषण: सहिष्णूतेची वाट | Maharashtra Times

सहिष्णूतेची वाट
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून काय साध्य होते, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आणि पूर्वसूरींच्या भाषणांचे दाखले देऊन या भाषणांचे मूल्यमापन केले जाते. तुलना अपरिहार्य असली तरी साहित्याचा प्रवास, त्यातील वेगवेगळे प्रवाह, काळाबरोबर बदलत गेलेली साहित्यिकांपुढची आव्हाने अशा अनेक बाबींचा विचार करणे गरजेचे असते आणि त्यानुसार वेगवेगळ्या फुटपट्ट्यांवर ही तुलना करण्याची गरज असते. परंतु त्या तपशीलात न जाता बहुतेकवेळा भाबडेपणाने तुलना केली जाते, अशांना भूतकाळही नीट माहीत नसतो आणि वर्तमानाचेही नीट आकलन नसते. त्यामुळे उथळ शेरेबाजीच्या पलीकडे या मूल्यमापनाला फारसा अर्थ उरत नाही.

या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या भाषणाचा विचार करताना अनेक सकारात्मक बाबी सापडतात. कंठाळी आवाज न करता संयतपणे तरीही ठामपणे आपले म्हणणे मांडता येते, हे त्यांनी दाखवून दिले. अरुणा ढेरे या संवेदनशील कवयित्री, शैलीदार ललितलेखिका, चिंतनशील विचारवंत आणि संशोधक आहेत. रा. चिं. ढेरे यांचा समृद्ध वारसा त्यांना लाभलेला आहे. त्यांचे छापील भाषण ४८ पानांचे असून त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा ऊहापोह केला आहे, चर्चा केली आहे. त्या भाषणासंदर्भात प्रामुख्याने मंथन व्हायला पाहिजे, त्यातील मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा होणे संयुक्तिक ठरले असते. परंतु परिस्थितीचा रेटाच असा निर्माण झाला की, अरुणा ढेरे यांनाही आपले कष्टपूर्वक तयार केलेल्या भाषणाकडे थोडे दुर्लक्ष होईल, अशा वेगळ्याच मुद्द्यांना प्राधान्याने भिडावे लागले. अर्थात त्यांच्या छापील भाषणातही अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतचा मुद्दा आहेच, परंतु त्याहीपेक्षा त्यांनी ताज्या संदर्भाच्या अनुषंगाने आयत्या वेळी जी मांडणी केली, तीच प्रभावी ठरली. अर्थात त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेबरोबरच साहित्यिकांच्या सत्त्व आणि स्वत्वाचे दर्शन घडवण्यासाठी ती गरजेची होती.

संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याच्या घटनेमुळे संमेलन वादात सापडले होते. अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि स्थानिक संयोजन समिती यांच्यातील मतभेद टोकाला गेले आणि त्यातून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना राजीनामा द्यावा लागला.

या सगळ्या घटना-घडामोडींमध्ये अरुणा ढेरे यांच्या भूमिकेकडे साहित्य रसिकांचे लक्ष लागले होते. अरुणा ढेरे यांनीच संमेलनावर बहिष्कार घालावा, असा सूरही व्यक्त होत होता. ढेरे यांच्या चाहत्यांचा जीव तर टांगणीला लागला होता, कारण प्रसंग सत्त्वपरीक्षेचा होता आणि आपली आवडती कवयित्री, लेखिका त्या सत्त्वपरीक्षेला कशी सामोरी जाते याबाबत कुतूहल आणि धाकधूकही होती. अरुणा ढेरे यांनी घडलेल्या घटनेसंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून आपल्या चाहत्यांची मने जिंकली. एखाद्याला बोलवावे आणि नंतर पुन्हा त्याला आपणच येऊ नका असे कळवावे, ही त्याच्यासाठी अपमानजनक आणि आपल्यासाठी लाजीरवाणीच गोष्ट आहे, अशा स्पष्ट शब्दात भावना व्यक्त केल्या.

पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून या विषयाला वाचा फोडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही या घटनेमुळे महाराष्ट्राची अप्रतिष्ठा झाल्याची भावना व्यक्त केली होती. आधीच्या वक्त्यांनी पार्श्वभूमी तयार केली असली तरी अध्यक्षांच्या भाषणाला महत्त्व असते आणि ते महत्त्व जाणून अरुणा ढेरे यांनी आपल्या शैलीत ठामपणे मतप्रदर्शन केले. झुंडशाहीच्या बळावर कोणी जर आपल्याला भयभीत करत असेल, तर आपण केवळ नमते घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का? असा प्रश्न विचारून साहित्य महामंडळालाही आरसा दाखवला. या संमेलनाच्या निमित्ताने सातत्याने आणीबाणीच्या काळातील कराडच्या संमेलनाचा संदर्भ देऊन दुर्गाबाई भागवत यांची आठवण केली जात होती. त्यासंदर्भातली त्यांनी आपण दुर्गा भागवत नाही, असे नम्रपणे सांगून आपल्या भिन्न लेखन आणि स्वभावधर्माचे सूचन केले.

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्यामुळे अध्यक्षपदापासून वंचित राहिलेल्या साहित्यिकांचे स्मरण तसेच निवडणूक लढवूनही पराभूत झालेल्या इंदिरा संतांची आठवण काढून त्यांनी संवेदनशीलतेचे अनोखे दर्शन घडवले. सहिष्णू वृत्तीची जोपासना आणि ज्ञानोपासना हीच जगात कल्याण मार्गावर चालण्यासाठीची सर्वोत्तम वाट आहे. साहित्य हा एक उत्सव असून अनेक कारणांमुळे तो गढूळ झाला आहे. त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रातील लहानथोरांनी एकत्र येऊन त्यावर विचारमंथन करण्याची सूचना करताना त्यांनी मराठी साहित्य जगताला सहिष्णूतेची वाट दाखवली.

via अरुणा ढेरे अध्यक्षीय भाषण: aruna dhere’s speech for marathi sahitya sammelan and its connotations – सहिष्णूतेची वाट | Maharashtra Times

Leave a Reply