करोनाच्या साथीमुळे लागू असलेला लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपुष्टात येण्याच्या दोन दिवस आधीच ही टाळेबंदी आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्यात आल्याचे जाहीर …
ग्रीन झोनमध्ये सर्व उपक्रमांना परवानगी असली, तरी काही अटी असतील. उदाहरणार्थ, बसमध्ये निम्मेच प्रवासी बसू शकतील. टाळेबंदीच्या दोन टप्प्यांत न मिळालेल्या आणि त्याबद्दल चर्चेचा विषय बनलेल्या मद्यविक्रीलाही सशर्त परवानगी तिसऱ्या टप्प्यात मिळणार असल्याने अनेकांना तोही मोठा दिलासा वाटू शकतो. हा दिलासा आतापर्यंतच्या असह्य पद्धतीने घालवलेल्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर आश्वासक वाटतो. तसा तो आहेही. तथापि, या काळातून आर्थिकदृष्ट्या बाहेर पडण्याचा मार्ग कोणता, याबाबत अद्याप दिलासा मिळालेला नाही. या आर्थिक प्रश्नाकडे इतके दुर्लक्ष होत आहे, की जणू कोणालाही त्या प्रश्नाला थेट भिडावेसे वाटत नाही की काय, अशी शंका यावी; कारण एक देश म्हणून आपण अद्याप वास्तव तरी जाणून घेतले आहे का, याचेही ठोस उत्तर सापडत नाही. दोन आठवड्यांनंतर टाळेबंदीचा काळ संपल्यानंतर आपली अर्थव्यवस्था कोणत्या मार्गाने चालणार आहे, याचा अंदाज यायला हवा. जगभरातील बहुतांश विमान कंपन्या दिवाळखोरीत जाऊ शकतात, असा अंदाज आहे. एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवातच अनेक उद्योगधंद्यांसाठी ताळेबंदावर अधोरेखित लाल रेषेने झाली आहे. या कालावधीत अर्थातच बंधने आल्याने अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असलेल्या वाहन क्षेत्राने कधी नव्हे, ती शून्य विक्री नोंदवली. ही परिस्थिती बिकट आहे, असे वाटत असतानाच टाळेबंदीचा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढविल्यामुळे आर्थिक स्थितीच्या दृष्टीने हे गंभीर चित्र मानले जात आहे; कारण त्यामुळे एकंदर टाळेबंदीचा कालावधी जवळपास दोन महिन्यांचा होणार असून, तो कोणत्याही उद्योगासाठी चांगली गोष्ट मानली जात नाही. ही परिस्थिती आणीबाणीची आहे, हे कधीच कळून चुकले आहे, त्यामुळे आता या भीषण परिस्थितीच्या आकडेवारी आणि वर्णनाऐवजी या बिकट परिस्थितीतून वाट काढणारा भविष्यकालीन नकाशा हवा आहे; कारण याच आर्थिक परिस्थितीमुळे लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचा आढावा अर्थात गृह खात्यातर्फे घेतला जात असलेच; कारण आता तीन झोन झाल्यामुळे लाल झोनमधील लोक हरित झोनमध्ये जाऊन जीवन सुकर करण्याचा गर्दी करून प्रयत्न करतील. याचा मुख्य संबंध रोजंदारीवरच्या कामगारांचा आहे. त्यांचे जीवनच रोजच्या रोज कमाई आणि पोट भरण्यावर आहे. अनेक अडकलेले स्थलांतरित मजूर हातांना काम नसल्याने उपासमारीची वेळ आणि घरी जाण्याची ओढ या दोन टोकदार प्रश्नांनी ग्रासलेले आहेत आणि त्याचा कदाचित उद्रेक या काळात होऊ शकतो. अनेक मजूर विविध मार्ग अवलंबून आपल्या गावी पोहोचत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही मजूर सिमेंटच्या मिक्सरमधून जाताना आढळलेले आहेत. अनेक जण पायी निघाले आणि कित्येक जण वाटेत मरण पावले आहेत. त्यामुळे हा वाईट आणि अतिवाईट या दरम्यानच्या निर्णयाचा संघर्ष आहे. मजूर, स्थलांतरित असोत, वा व्यावसायिक आणि नोकरदार, त्यांच्या बिथरण्याच्या मुळाशी आर्थिक प्रश्नच आहे, की या सगळ्यातून आर्थिकदृष्ट्या आपण कसे बाहेर पडणार? त्याच्यासाठीचा पुढचा मार्ग काय आहे? पुढील योजना काय आहेत? उद्योगापासून रोजंदारीपर्यंतच्या व्यक्तींसाठी नव्या आर्थिक रचना कशा असतील? त्यातून सर्वांना आर्थिक साह्य अथवा दिलासा कसा दिला जाईल? याबाबतीत कोणत्याही मार्गदर्शक सूचना, कोणतेही चित्र अथवा कोणत्याही संकल्पना अजून मांडल्या जात नाहीत. त्यामुळे अस्वस्थता आहे. त्यातूनच परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत जाणार, हे वेगळे सांगायला नको. या स्तंभातून सरकारने करोना नंतरच्या जगासाठी आर्थिक रोडमॅप निर्माण करण्याकरिता कृतिदल स्थापन केले पाहिजे, अशी मागणी केली होती. तिसऱ्या टाळेबंदीच्या निमित्ताने त्याचा पुनरुच्चार करायला हरकत नाही; कारण उशीर झाला असला, तरी काही वेळ हातात आहे, तो वापरायला हवा.
—
via Editorial News : अनुत्तरित प्रश्न – unanswered questions | Maharashtra Times