उद्योजक अडचणीत;करोनामुळे सुट्या भागांचा तुटवडा — महाराष्ट्र टाइम्स

औरंगाबाद : महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक उत्पादन केंद्र असलेल्या औरंगाबादमधील कंपन्यांना सध्या सुट्या भागांची चणचण भासत आहे. करोना विषाणूमुळे चीनमधील औद्योगिक उत्पादन जवळजवळ बंद आहे. चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा त्यामुळे थांबला असून त्याचा फटका औरंगाबादेतील उद्योजकांना बसतो आहे.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर (सीमिआ) या संघटनेचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांच्या मते, औरंगाबादमध्ये चार हजारहून अधिक कारखाने आहेत. त्यापैकी अनेक कारखाने चीनमधून सुटे भाग मागवत होते. या सुट्या भागांच्या पुरवठासाखळीला करोनामुळे खीळ बसली आहे. त्यामुळे आता येथील कंपन्यांनी सुट्या भागांसाठी अन्य देशांची चाचपणी सुरू केली आहे. सुटे भाग वेळेवर न मिळाल्यास अंतिम उत्पादितांवर परिणाम होतो आणि बाजारपेठेत माल उशिरा पोहोचतो, ज्यामुळे विक्री आणि नफ्याचे गणित चुकते. करोनामुळे सुटे भाग मिळत नसणे ही अतिलघू, लघू व मध्यम उद्योगांसाठी सुसंधी असल्याचा दावाही कोकिळ यांनी केला आहे.

मात्र सौरऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उद्योगांना करोनाचा चांगलाच फटका बसला आहे, अशी माहिती सौरऊर्जा उपकरणांचे निर्माता एम. पी. शर्मा यांनी दिली. त्यामुळे आता सौरऊर्जा उपकरणांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांसाठी भारतीय उद्योजकांनी आता व्हिएतनाम व तैवानकडे मोर्चा वळवण्यास सुरुवात केली आहे.

via coronavirus news : उद्योजक अडचणीत;करोनामुळे सुट्या भागांचा तुटवडा – Spare Part Dealer Facing Shortage Due To Corona Virus | Maharashtra Times

Leave a Reply