gandhi in unavoidable – editorial in Marathi, Maharashtra Times

गांधीजींच्या जन्माला १४८ वर्षे झाली आहेत आणि छातीवर गोळ्या झेलत त्यांनी ‘हे राम’ म्हटले त्याला ६९ वर्षे झाली आहेत, तरीही भारतीयांच्या मानसिकतेवरील गांधीजींचा प्रभाव जराही कमी झालेला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जी काँग्रेस विसर्जित व्हावी, अशी गांधीजींची इच्छा होती त्या काँग्रेसने राजकारणात सतत गांधींना वेठीला धरले आणि जणू काही ती आपली मालमत्ता आहे, असा आव आणला. गांधीजींच्या वैचारिक बैठकीला छेद देणारी विचारसरणी सतत मांडून भारतीय जनता पक्षाने आपली राजकीय बैठक तयार केली. मात्र, पूर्ण क्षमतेची सत्ता मिळताच त्या पक्षानेही आपल्या बैठकीत गांधीजींची तसबीर लटकवली. निमित्त केले ते स्वच्छतेचे. नेहरुंच्या निधनानंतर आणि विशेषतः १९७० नंतर काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत जे आमूलाग्र बदल झाले त्या बदलांनी पदोपदी गांधीजींचा पराभव केला. ‘एखादी गोष्ट करताना त्यात हृदय ओतले पाहिजे, केवळ शब्दांची उतरंड नको’, असे गांधीजी म्हणाले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी नेमके याच्या उलट केले. तोंडाने सतत गांधीजींचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्ष कृती मात्र स्वार्थाने प्रेरित करायची. भारताच्या ग्रामीण भागाचा आणि सर्व प्रकारच्या संधीअभावी देशाच्या प्रगतीचे वारे ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते, अशा लहानातल्या लहान माणसाचा विचार करून गांधीजींनी ग्रामस्वराज्याची कल्पना मांडली होती. हिंदू आणि मुस्लिम या दोन घटकांतील भावी संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ‘मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ’ अशी संकल्पना मांडली व धाकट्याला असुरक्षित वाटू नये, याची खबरदारी मोठ्याने घ्यावी असे सूत्र समाजापुढे ठेवले. काँग्रेसने या दोन्ही गोष्टींचे केवळ राजकारण केले. ग्रामस्वराज्य केवळ भाषणांत राहिले आणि काही मोजक्या शहरांचे महत्त्व वारेमाप वाढून त्या दिशेने लोंढे जाऊ लागले. परिणामी शहरांचे प्रश्नही बिकट बनले. अल्पसंख्यांकांसाठी आपण खूप काही करतो आहोत, असा भास निर्माण करून त्यांचे प्रश्नही अर्धवट ठेवले आणि मतपेटी सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गांधीविचार आणि गांधीजी यांचा टोकाचा द्वेष करणाऱ्यांचे फावले. गांधीच्या हत्येचा ‘वध’ असा उल्लेख करणारी, देशाच्या फाळणीसाठी गांधीजींना जबाबदार धरणारी, गांधीजींना पाकधार्जिणे म्हणणारी एक विचारसरणी होतीच. ती बळकट झाली. अशाप्रकारे गांधीजींचा आदर आणि अनादर करीत सात दशके गेली, तरीही गांधीजी हा चर्चेचा विषय ठरतो. गांधींजींनी अखेरच्या क्षणी खरोखरच ‘हे राम’ म्हटले होते का, त्यांनी छातीवर तीन गोळ्या झेलल्या की चार, गोडसेशिवाय आणखी एखाद्या व्यक्तीनेही त्याच क्षणी गोळी झाडली होती का, भगतसिंग आणि सहकाऱ्यांची फाशी गांधीजी टाळू शकले असते का अशा प्रश्नांची चर्चा आजही होते. गांधीजी आग्रही होते, आपल्या मतांवर ठाम होते. गांधीजी माणूस होते. एखादी व्यक्ती वयाच्या तिसाव्या वर्षी जे मत व्यक्त करते तेच सत्तराव्या वर्षी कायम राहील, असे नव्हे. मात्र, त्यांच्या वक्तव्यांचे असे तुकडे घेऊन भुई धोपटत बसणे हा अनेकांचा छंद आहे. या देशावर राज्य करताना गांधींचे नाव टाळता येत नाही, हे मात्र वारंवार सिद्ध झाले आहे.

via gandhi in unavoidable – editorial in Marathi, Maharashtra Times

Leave a Reply