दुर्दैवाचे दशावतार – -महाराष्ट्र टाइम्स

देशभरातील शहरांमधून गावाकडे जाणाऱ्या श्रमिकांच्या दुर्दैवाचे दशावतार अद्याप संपलेले नाहीत आणि ते कधीपर्यंत सुरू राहणार आहेत, हे आज कुणालाच सांगता येत नाही. पॅकेजवर पॅकेजची घोषणा करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या श्रमिकांना तातडीने दिलासा मिळेल, अशी कोणतीही गोष्ट केलेली नाही. देशाच्या न्यायदेवतेनेही डोळ्यांवर पट्टी बांधली असल्यामुळे रस्त्यावर तडफडणारे लाखो लोक त्यांच्या नजरेस पडलेले नाहीत. घराच्या, कुटुंबाच्या ओढीने धोकादायक प्रवास करून, पायी चालत शेकडो किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्या या श्रमिकांपैकी अनेकजण घरापर्यंतही पोहोचू शकणार नाहीत, हे वास्तव दिसतेच आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या रेल्वे अपघातात १६ लोकांचे प्राण गेले, पाठोपाठ फरिदाबादहून गोरखपूरला निघालेल्या ट्रॉलीला अपघात होऊन २३ लोकांचा मृत्यू झाला आणि २० लोक जखमी झाले. मध्य प्रदेशातील सागरजवळ झालेल्या आणखी एका अपघातात सहा लोक ठार झाले. श्रमिकांनी स्थलांतर केल्यानंतर झालेल्या अपघातात ६५ लोकांचे बळी गेल्याची आकडेवारी आहे. उन्हामुळे आणि भुकेमुळे रस्त्यात तडफडून प्राण सोडलेल्यांची संख्या मोठी असू शकेल आणि त्यांची कुठे अधिकृत नोंदही ठेवली जाणार नाही. विश्वगुरू होण्यासाठी उत्सुक असलेल्या देशातील श्रमिकांचे हे वास्तव आहे आणि त्याकडे कोणत्याही यंत्रणेने संवेदनशीलतेने लक्ष दिलेले नाही. २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा टाळेबंदी जाहीर केली, तेव्हापासून श्रमिकांची ही परवड सुरू आहे. अगदी प्रारंभीच्या काळातील सरकारी यंत्रणांचे गोंधळलेपण समजून घेता येण्यासारखे होते; परंतु एकापाठोपाठ एक करत तीन टाळेबंदी पूर्ण होऊन चौथी टाळेबंदी जाहीर होत असताना आणि दोन महिन्यांचा कालावधी गेला असतानाही या कष्टकऱ्यांच्या यातना कमी करण्यासाठी ठोस पावले टाकली गेली नाहीत. सरकारी पातळीवरून केलेली रेल्वे प्रवासाची व्यवस्था अत्यंत तोकडी आहे आणि त्या धोरणांतही स्पष्टता नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे. याशिवाय, ठिकठिकाणी पोलिसांकडून लाठीमार होतो आहे, तो वेगळाच. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या अत्यंत कठीण काळात इथल्या तळागाळातील कष्टकरी वर्गामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांपैकी कोणतीही यंत्रणा विश्वास निर्माण करू शकली नाही, हे दुर्दैव.

via Dhavte Jag News : दुर्दैवाचे दशावतार – challenges faced by migrant workers | Maharashtra Times

Leave a Reply