नामुष्कीच्या नोटिसा –महाराष्ट्र टाइम्स

नामुष्कीच्या नोटिसा

एखाद्या पोलिस अधिकाऱ्याच्या चुकीच्या आकलनामुळे किंवा निष्काळजीमुळे तमाम पोलिस दलाला नामुष्की सहन करावी लागते, याचे उदाहरण म्हणून वसईतील साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्त्यांना बजावलेल्या नोटिसांवरून दिसून येते. साहित्यिकांना नोटिसा

बजावून आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यामुळे होऊ लागली आहे. याविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर साहित्यिकांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात आल्या आहेत आणि ज्यांनी या नोटिसा बजावल्या त्या अधिकाऱ्यांनाच कारणे दाखवा नोटिसांना सामोरे जावे लागले आहे. निवडणुकांबरोबरच राष्ट्रीय सण-उत्सवांच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना काही पावले उचलावी लागतात आणि त्यांची नेहमीची कार्यपद्धती ठरलेली असते. त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा पाठवल्या जातात. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून अशा नोटिसा दिल्या गेल्या असतील. परंतु कवी सायमन मार्टिन, सामाजिक कार्यकर्ते मार्कुस डाबरे यांनाही नोटिसा गेल्यामुळे पोलिसांच्या कृतीवर टीकेची झोड उठली. स्थानिक अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे झालेली ही कारवाई असू शकते. परंतु कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेने एवढेही अडाणी असता कामा नये. मागेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या तरुणींवर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली होती, किंवा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळात असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या घटनांना यानिमित्ताने उजाळा मिळाला. वसई पोलिसांनी मार्टिन, डाबरे यांच्यावरील नोटिसा मागे घेऊन आपली चूक दुरुस्त केली आहे आणि स्थानिक पोलिसांच्या या चुकीची वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली गेली. या नोटिसांविरोधात आवाज उठला नसता तर कदाचित हे सत्र पुढे इतरत्रही सुरू झाले असते. परंतु समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यामुळे पोलिसांना कारवाई मागे घ्यावी लागली, हे इथे महत्त्वाचे आहे.

via Dhavte Jag News: नामुष्कीच्या नोटिसा – dismissal notices | Maharashtra Times

Leave a Reply