मंदीचा दाह; फेब्रुवारीत बेरोजगारी वाढली –महाराष्ट्र टाइम्स

नवी दिल्ली : मंदीने औद्योगिक क्षेत्राला जेरीस आणले असून याची मोठी झळ रोजगारांना बसत आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतातील बेरोजगारी वाढल्याचा दावा एका संस्थेने केला आहे. मंदीमुळे खर्च कपातीचा मार्ग अवलंबिलेल्या कंपन्यांनी नवीन नोकर भरती बंद केली असून आहेत त्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जात आहे. त्यामुळे भविष्यात बेरोजगारीचे नवं संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

वाचा : सरकारच्या राजकारणामुळे अर्थव्यवस्थेचा बोजवारा; राजन

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने सोमवारी बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात ७.७८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या चार महिन्यातील बेरोजगारीचा उच्चांकी स्तर आहे. या आधी आॅक्टोबरमध्ये तो सर्वाधिक होता. जानेवारीमध्ये बेरोजगारीचा दर ७.१६ टक्के होता. आॅक्टोबरनंतर प्रथमच देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.

प्रॉव्हिडंट फंडांवरील व्याजदर यंदा घटणार?

लघु आणि मध्यम उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्या, वाहन क्षेत्र, एफएमसीजी, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील कंपन्यांना मंदीचा जबर फटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत विकास दर ४.७ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मंदी आणि ‘करोना’चा कहर यामुळे अर्थव्यवस्थेची वाढ खुंटली आहे. त्यातच बेरोजगारी वाढल्यानं मंदीची दाहकता आता जाणवू लागली आहे.

मंदीचे ढग दाटले; विकासदराचे रडगाणे सुरूच

ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली आहे. ‘CMIE’च्या अहवालानुसार ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण फेब्रुवारी महिन्यात ७.३७ टक्क्यांपर्यंत गेले. जानेवारीत ते ५.९७ टक्के होते. शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण ८.६५ टक्के आहे. त्याआधी ते ९.७० टक्के होते.

SIP सुरु करताय;’हा’ आहे तज्ज्ञांचा सल्ला

उद्योगांना मंदीने ग्रासले आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील वस्तू आणि सेवांची मागणी वाढविण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करत आहे. मात्र वाढत्या बेरोजगारीने सरकारपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. यापूर्वीही बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर वारंवार टीका केली होती. आता पुन्हा एकदा बेरोजगारीचा दर वाढल्याने सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

via unemployment increased in February : मंदीचा दाह; फेब्रुवारीत बेरोजगारी वाढली – unemployment rate increased in rural india | Maharashtra Times

Leave a Reply