केवळ शब्दच्छल! –महाराष्ट्र टाइम्स

केवळ शब्दच्छल!
लिंचिंग या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘ऑक्सफर्ड’च्या शब्दकोशात, झुंडीने एखाद्याला बेकायदा फाशी देऊन ठार मारणे, असा दिला आहे. गेल्या काही वर्षांत देशात झुंडींनी माणसांवर हल्ले करून त्यांना ठार मारण्याच्या घटना घडल्याने भारतीय बोलीभाषांतही हा शब्द मूळ धरू लागला आहे. या घटना देशात प्रथमच घडल्या असे नाही. माणसाच्या मूळ नेणिवा या आदिमच असतात. भावनेच्या भरात या आदिम नेणिवा सारासार विचार करण्याच्या शक्तीवर मात करतात. त्यामुळेच झुंडीनी एकट्या-दुकट्या माणसांना पकडून ठार मारणे, हे वर्षानुवर्षे सुरू आहे. स्वातंत्र्य ज्या फाळणीची खोल जखम देऊन मिळाले, त्यावेळी पडलेले हजारो बळी हे अशाच झुंडींनी घेतले. तरीही गेल्या पाच-सहा वर्षांत देशभर झुंडींनी मारलेल्या माणसांबद्दल खूप चर्चा झाली, असा काहींचा आक्षेप असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात आपल्या बौद्धिकात हा मुद्दा छेडल्यामुळे आता पुन्हा नव्याने तोंड फुटले. लिंचिंग ही संकल्पना भारतीय नसल्याचे ते म्हणाले. अशी हिंसक कृत्ये करणाऱ्यांवर त्यांनी टीकाही केली. मात्र, अशा घटनांबद्दल एकाच समाजघटकला कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, अयोग्य असल्याचेही ते म्हणतात. सरसंघचालकांचे म्हणणे योग्यच आहे. एखाद्या घटनेमुळे एखाद्या विशिष्ट धर्माला किंवा समाजघटकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे खचितच योग्य नाही. मात्र, देशभरात गेल्या पाच-सहा वर्षांत शंभरापेक्षा अधिक जणांना ठेचून मारल्याच्या घटनांकडे लक्षपूर्वक पाहिले तर एक समान धागा दिसतो. तो म्हणजे यातील बहुतांश बळी हे अल्पसंख्य समाजातील निम्न-मध्यमवर्गियांचे आहेत. यातील बहुतेकांनी आपल्याजवळ गोमांस बाळगल्याचा किंवा ते गायींची हत्या करण्यासाठी वाहतूक करत असल्याचा या झुंडींना वहीम होता. उत्तर प्रदेशात दादरी या ठिकाणी अखलाक या व्यक्तीला त्याच्या घरात फ्रीजमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून झुंडीने ठेचले. त्याच्या खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या रवी सिसोदिया या आरोपीचा मृत्यू झाला. सिसोदियाचे पार्थिव तिरंगी झेंड्यात गुंडाळून मानवंदना देण्यात आली. या सिसोदियांनी कोणती देशसेवा केल्याबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आला? याच घटनेची चौकशी करणारे पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांच्यावरही झुंडीने बुलंदशहर इथे हल्ला केला. त्यांना लाठ्या-काठ्या, कुऱ्हाडीने बेदम मारहाण करून नंतर गोळी झाडून ठार मारले. यात बजरंग दलाचे सदस्य योगेश राज यांच्यावर संशय होता. ते अनेक दिवस फरारी होते. नंतर त्यांच्यासहित तीसेक जणांना पोलिसांनी अटक केली. आता ते जामिनावर मुक्त आहेत आणि सुबोध कुमार यांच्या पत्नी व कुटुंबाने जिवाला त्यामुळे धोका असल्याचे म्हटले आहे. झारखंडमध्येही अलिमुद्दीन अन्सारी यांना झुंडीने गोमांस विकल्याच्या संशयावरून ठेचून मारले. यात अकरा जणांना अटक झाली. त्यातील आठांना जामीन मिळाल्यावर तेव्हाचे केंद्रीय मंत्री व भाजपनेते जयंत सिन्हा यांनी त्यांचा हार घालून सत्कार केला. अशा आणखी अनेक घटना सांगता येतील. सरकारपक्षाचे नेते वा तो पक्ष ज्या मातृसंघटनेकडून वैचारिक ऊर्जा घेतो, त्या संघटनेचे किंवा इतर भातृसंघटनांचे सदस्य अशावेळी संशयित म्हणून पकडले जात असतील, आणि मंत्री, खासदार, आमदार अशा गुन्हेगारांचे स्वातंत्र्यसेनानी असल्याप्रमाणे सत्कार करत असतील तर त्यावर टीकात्मक चर्चा होणे स्वाभाविकच आहे. मात्र, तरीही डॉ. भागवत म्हणतात त्याप्रमाणे याचा संबंध जर कुणी एखाद्या धर्माशी लावून टीका करत असेल तर ते अश्लाघ्य आहे. लिंचिंग या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना त्यांनी येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील एका घटनेचा संदर्भ दिला. इतिहास हा धडा घेण्यासाठीच लक्षात ठेवायचा असतो. ख्रिस्ती धर्माचा इतिहास असो की ख्रिस्ती व मुस्लिमांमधील क्रुसेड्स असोत, यातील शौर्याच्या गाथांचे कौतुक पाश्चिमात्य बुद्धिवंत करत नाहीत. इतकेच कशाला, आधुनिक इतिहासात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत कृष्णवर्णियांच्या श्वेतवर्णियांनी ठेचून केलेल्या हत्यांच्या विरोधात कृष्णवर्णियांच्या खांद्याला खांदा लावून श्वेतवर्णी नागरिक लढलेच होते. आजही लढतात. सर्व धर्मांच्याही वर असलेला मानवता धर्माची हीच तर शिकवण आहे. उरला प्रश्न लिंचिंग या संकल्पनेचा. भारतीय प्राचीन इतिहासातील हिंसेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रोमिला थापर, डॉ. उपिंदर सिंग अशा बुद्धिवंतांनी जो प्रकाश टाकला आहे, तो सप्रमाण खोडून तरी काढायला हवा. विजयादशमीच्या शुभेच्छा देताना केवळ शब्दच्छल केल्याने ते साधणे कठीण आहे!

via Editorial News: केवळ शब्दच्छल! – on mohan bhagwat speech | Maharashtra Times

Leave a Reply