संपूर्ण जगाला भीतीच्या छायेखाली ठेवणाऱ्या ‘करोना‘च्या अप्रत्यक्ष झळाच अधिक बसू लागल्या आहेत. सोशल मीडियासारखे संवेदनशील माध्यम बेजबाबदारपणे वापरण्याकडे आणि त्यातून अफवा फिरवण्याकडे कल वाढल्याने या झळांमध्ये भर पडते आहे. करोनाचा प्रसार चिकन खाल्ल्याने होत असल्याची वदंता त्यातूनच रचली गेली. त्याची बनावट छायाचित्रे, चलत्चित्रे पसरवली गेल्याने खवय्यांनी ‘चिकन नकोच’चा पवित्रा घेतला. या दुष्टचक्रामुळे पोल्ट्री व्यवसाय गारद होत आहे.
कोंबडी आणि अंडी उत्पादनास याचा मोठा फटका बसत असून हजारो टन कोंबड्या पडून आहेत. चिकन व अंड्यांचे दर गडगडले आहेत. ग्रामीण रोजगाराचे आणि कृषिपूरक व्यवसायाचे प्रमुख साधन म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो. मटणाचे दर आवाक्याबाहेर गेल्याने चिकनला चांगले दिवस आले होते. ‘करोना’ विषाणूच्या जीवघेण्या प्रसारामुळे याला ब्रेक लागतो आहे. राज्याच्या काही भागात त्याची १६० ते दोनशे रुपयांनी प्रतिकिलो विक्री होत होती. ‘करोना’च्या उद्रेकाने अर्थव्यवस्थेला हादरे द्यायला सुरुवात केली असून अवघ्या पंधरा-वीस दिवसांत त्याचे थेट परिणाम कृषिपूरक धंद्यांवर दिसत आहेत.
राज्यात दोन हजार टनांवर चिकनची विक्री होते, ती आता तेराशे टनांवर आली. गेल्या पंधरा दिवसांत रोज दीडशे कोटींचे नुकसान झाल्याचा दावा पोल्ट्री व्यावसायिक करत आहेत. दीडशे रुपयांची कोंबडी अवघ्या चाळीस-पन्नास रुपयांत विकण्याची वेळ आली आहे. कोंबड्यांच्या खाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मक्याच्या पिकालाही याचा दणका बसला असून ऐन सुगीत मक्याचे दर क्विंटलला साडेचारशे-पाचशे रुपयांनी घसरले. या स्थितीत चिकन खाल्ल्याने ‘करोना’चा प्रसार होत नाही, या सत्याचा प्रसार सरकारी यंत्रणा, समाजमाध्यमांनी जबाबदारीने करणे गरजेचे आहे. पोल्ट्री व्यवसायावर लाखोंचे पोट अवलंबून आहे, हे विसरता येणार नाही.
via coronavirus : पोल्ट्रीला फटका! – coronavirus and poultry business | Maharashtra Times