संयमाचा सांगावा –महाराष्ट्र टाइम्स

करोनाने समाजातील सर्व घटक हलवून आणि हादरवून सोडले आहेत. कुठलेही संकट आले, की सामान्यांना सर्वाधिक फटका बसतो. करोना विषाणू सामान्य-असामान्य असा भेद करीत नसला, तरी त्या अनुषंगाने ओढवलेल्या विपरीत परिस्थितीत परवड होत आहे, ती सामान्यांचीच.

संयमाचा सांगावा
करोनाने समाजातील सर्व घटक हलवून आणि हादरवून सोडले आहेत. कुठलेही संकट आले, की सामान्यांना सर्वाधिक फटका बसतो. करोना विषाणू सामान्य-असामान्य असा भेद करीत नसला, तरी त्या अनुषंगाने ओढवलेल्या विपरीत परिस्थितीत परवड होत आहे, ती सामान्यांचीच. ‘मुस्लिम वा ख्रिश्चन हे संघाचे शत्रू नाहीत,’ असे गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात नमूद करणाऱ्या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, करोनाच्या पार्श्वभूमीवर परवा झालेल्या ऑनलाइन बौद्धिक वर्गात ‘भय अथवा क्रोधाच्या कृतीमुळे कुण्या संपूर्ण समूहाला जबाबदार ठरवून दूर सारणे योग्य नाही,’ असे जाणीवपूर्वक सांगितले. हे त्यांचे संयमाचे सांगणे स्वागतार्ह आहे. करोनाचे संकट अभूतपूर्व आहे. द्वेष बाजूला ठेवून या संकटावर मात करणे गरजेचे आहे. एकोपा आणि परस्पर सहकार्यातून हे शक्य आहे. सोशल मीडियातून एका समुदायाच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी, या संकटसमयी कुठलाही भेदभाव न करण्याचे आवाहन केले. ‘सर्व १३० कोटी भारतीय आपले आहेत,’ ही खूणगाठ बांधायला सांगितली. संघाच्या विविध सेवा प्रकल्पांमधून गरजूंना दिलासा आणि आधार देणारी विविध उल्लेखनीय कामे सुरू आहेत. या कामांची प्रशंसा केली. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन केलेच पाहिजे हे सांगताना, डॉ. भागवतांनी स्वदेशीची कास धरण्यावर भर दिला. हे आरोग्यसंकट टळले, तरी पुढचा काळ कठीण आहे. करोनाने भल्या भल्या विकसित देशांची अर्थव्यवस्था मोडीत काढली असताना, भारतही उणेकडे झुकला आहे. यातून शक्य तितक्या लवकर सावरणे आणि बाहेर निघणे अत्यावश्यक आहे. सरसंघचालकांनी पालघरच्या घटनेविषयी दु:ख व्यक्त करताना, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले; तसेच राजकारण्यांनी या संकटकाळात स्वार्थी भूमिका घेऊन चालणार नाही, हेही सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र करोनाचे राजकारण करीत असल्याचा सतत आरोप होत आहे. सरसंघचालकांचे सांगणे साऱ्याच राजकारण्यांनी मनावर घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असेल, तर ती चुकीची म्हणता येणार नाही.

via Dhavte Jag News: संयमाचा सांगावा – message of rss chief dr. mohan bhagwat | Maharashtra Times

Leave a Reply